पाकिस्तानातील बलुचिस्तान प्रांतामध्ये एका रेल्वेगाडीचे अपहरण होणे आणि त्यातील प्रवाशांच्या सुटकेसाठी पाकिस्तानी सुरक्षा दलांना २४ तासांपेक्षा अधिक काळ झगडावे लागणे या दोन्ही बाबी या विशाल प्रांतातील ठसठस आणि अस्वस्थता दर्शवतात. क्वेटाहून पेशावरला जाणाऱ्या जाफर एक्सप्रेसला एका बोगद्यात थांबवून बलुचिस्तान लिबरेशन आर्मीच्या बंडखोरांनी तिचा ताबा घेतला. रेल्वेगाडीतील २० पाकिस्तानी सैनिकांना ठार केले आणि जवळपास २०० प्रवाशांना ओलीस ठेवले. ही घटना मंगळवारी घडली आणि बुधवारी प्रवाशांच्या सुटकेसाठी पाकिस्तानी लष्कराने सुरू केलेल्या कारवाईत ५७ बंडखोर मारले गेल्याचा आणि जवळपास १००हून अधिक प्रवाशांची सुटका केल्याचा दावा पाकिस्तान सरकारने केला. विविध दाव्यांतील तथ्यता पडताळणे अवघड आहे. पाकिस्तान किंवा बलुच सरकारी माहितीस्राोत विश्वासार्ह नाहीत. बलुचिस्तान लिबरेशन आर्मीचे (बीएलए) दावे तपासून पाहणारी स्वतंत्र यंत्रणा नाही. आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थांना मुळातच पाकिस्तान किंवा बलुचिस्तानमध्ये मर्यादित प्रवेश असतो, त्यामुळे त्यांच्याकडून आकड्यांविषयी फार तपशील मिळू शकत नाही. कारवाई थांबेल कधी आणि कशी हेही अनिश्चित आहे. बंडखोर कितीही मोठ्या संख्येने उपस्थित असले तरी लष्कराच्या वाढत्या रेट्यासमोर कधीतरी ते हार जाणारच. मात्र इथे परिस्थिती अधिक गुंतागुंतीची आहे, कारण शरीराला स्फोटके बांधलेले आत्मघातकी बंडखोर प्रवाशांच्या सोबत बसलेले आहेत. त्यांना संपवण्यासाठी प्रवाशांच्या जीविताकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.