Ramgiri Maharaj : औरंगजेबाच्या कबरीवरुन राज्यात सुरु असलेल्या वादात प्रसिद्ध महंत रामगिरी महाराज यांनी आपलं मत व्यक्त केलं आहे. ‘नागपूरमध्ये एवढे दगड आले कुठून ?’ असा प्रश्न रामगिरी महाराजांनी उपस्थित केला.
सध्या राज्यामध्ये औरंगजेबाची कबर काढण्यावरून मोठा वाद सुरू असलेला पाहायला मिळत आहे. यावर बोलताना महंत रामगिरी महाराज यांनी अशा प्रकारच्या कबरी नकोय असं म्हटलं आहे. “औरंगजेब आक्रांत होता, तो काही भारतीय नव्हता, अशा प्रकारच्या आक्रांत लोकांना आदर्श मानून आराजकता पसरवण्याचे कामे होतात” असं रामगिरी महाराज म्हणाले. “ओसामा बिन लादेनला पाकिस्तानमध्ये घुसून अमेरिकेने ठार मारले. पण त्याच्या कबरीला जागा मिळू दिली नाही. असे आक्रांत लोक कबरीत गेले तर लोक त्याला आदर्श मानतात आणि अराजकता माजवतात त्यामुळे अशा लोकांच्या कबरी नकोत” असं महंत रामगिरी महाराज यांनी म्हटलय. ‘औरंगजेबाची कबर काढणं न काढणं हा सरकारचा विषय आहे’ असंही रामगिरी महाराज म्हणाले.
औरंगजेबाची कबर काढणं हा मुद्दा सध्या संयुक्तिक नसल्याचं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं म्हणणं आहे, यावर बोलताना महंत रामगिरी महाराज म्हणाले की “ज्या नावाने जेव्हा अराजकता वाढते, त्यावेळी असे प्रश्न निर्माण होतात, म्हणून हिंदुत्ववादी संघटनेने हा प्रश्न उपस्थित केला आहे. त्याला काही कारण आहे, जसं नागपूरमध्ये दंगल झाली ती अराजक तत्त्वाने केली आहे. हे ठरवून झालेलं आहे” ‘नागपूरमध्ये एवढे दगड आले कुठून ?’ असा प्रश्न रामगिरी महाराजांनी उपस्थित केला. “या अराजक लोकांना आदर्श मानून काही लोक असे प्रकार करतात आणि दंगली घडतात” असं मतं रामगिरी महाराजांनी व्यक्त केलंय.
नितेश राणेंवर काय म्हणाले?
मंत्री नितेश राणे हे वेळोवेळी भाषणांमधून मुस्लिम धर्माविरोधात टोकाचे वक्तव्य करतात, यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे कान टोचले अशा बातम्या समोर आल्या होत्या. यावर बोलताना महंत रामगिरी महाराज म्हणाले की, “कुणी कुणाच्या धर्माविषयी बोलणं हा विषय वेगळा आहे. धर्माबद्दल बोलण्याऐवजी त्या धर्मामध्ये जी अराजक तत्व असतात, त्यांच्याविषयी बोलणं महत्त्वाचं असतं. प्रत्येक धर्मात चांगले वाईट लोक असतात. पण धर्माच्या नावाखाली कोणी अराजकता निर्माण करत असेल तर त्याला विरोध करणं गरजेचंच असत” असं रामगिरी म्हणाले.